आजचा भारत कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून युवावर्गाचे सामर्थ्य देशाला प्रगतीपथावर नेईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देण्याऱ्या ६२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवक-केंद्रित उपक्रमांचं अनावरण केलं, त्यावेळी ते बोलत होते.
नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभाला संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले कौशल्य वाढल्यावर देश आत्मनिर्भर होतो, निर्यात वाढल्यास रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते त्यामुळे कौशल्यवृद्धी साठीच्या पी एम सेतू योजनेमुळे भारताचा युवावर्गाला जगाच्या कौशल्य मागणीशी जोडला जाईल, असं ते म्हणाले. देशातल्या आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्था केवळ प्रशिक्षणापुरत्या मर्यादित नसून त्या आत्मनिर्भर भारताच्या कार्यशाळा आहेत. देशात उत्पादकता, रोजगार, संरक्षण क्षेत्रात उत्पादकता वाढली आहे, एम एस एम ई मध्ये रोजगार वृद्धी होत आहे, याचा लाभ भारताच्या युवाशक्तीला होत आहे, असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री विकसित भारत योजनेमुळे देशातल्या सुमारे साडे तीन कोटी युवकांना खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याची द्वारे खुली होतील. बिहारमधल्या युवकांना बिहार मध्येच रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं त्यांनी सांगितलं. यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या सर्वोत्तम ४६ जणांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.