राज्य सरकारनं पीक वीमा योजनेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला बदल चुकीचा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं बातमीदारांशी बोलत होते. हा बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. म्हणून तो रद्द करावा, आणि आतापर्यंत सुरु असलेली योजनाच पुन्हा लागू करावी, अन्यथा शेतकरी, आणि काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
नैसर्गिक आपत्ती हंगामातली प्रतिकूल परिस्थिती, आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळत होती, ती पद्धतच सरकारनं योजनेतून काढून टाकली आहे. आणि केवळ पीक कापणीच्या आधारावर नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबली आहे, असं ते म्हणाले. ‘एक रुपयात विमा’ ही पद्धत बंद करण्याएवजी शासनानं विमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना रास्त नुकसान भरपाई कशी मिळेल हे पाहिले पाहिजे, असंही सपकाळ म्हणाले.