संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी सांगितलं की या अधिवेशनात सभागृहाच्या १५ बैठका झाल्या आणि त्यात १११ टक्के विधायक कामकाज झालं.

 

राज्यसभेत सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्याबद्दल अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं असं आवाहन त्यांनी केलं. सभागृहात ९२ तास प्रत्यक्ष कामकाज झालं असून १२१ टक्के उत्पादकता राहीली असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. जीरामजी विधेयकावरच्या चर्चेसाठी मध्यरात्रीपर्यंत सभागृहाचं कामकाज चालल्याचा उल्लेख त्यांनी केला. सभागृहाचे अध्यक्ष या नात्याने आपलं पहिलंच अधिवेशन होतं असं सांगून राधाकृष्णन यांनी उपाध्यक्ष, तालिका सदस्य, सभागृह नेते, आणि विरोधी पक्ष नेते यांचे आभार मानले.  

 

१ डिसेंबर पासून सुरु झालेल्या या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरम्, निवडणूक सुधारणा, रोजगार, विमा क्षेत्रातल्या सुधारणा तसंच ऊर्जा सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर  सखोल चर्चा झाली. या अधिवेशनात एकूण पाच महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यात विकसित भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि सुधारणा विधेयकांचा समावेश आहे.

 

दरम्यान, मनरेगा ऐवजी विबी जीरामजी राबवण्याच्या विधेयका विरोधात विरोधीपक्षांच्या खासदारांनी आजही संसदभवन परिसरात निदर्शनं केली.