संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. 

 

लोकसभेत आज कामकाज सुरू झालं तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र, निवृत्त कर्नल सोना राम चौधरी, प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली. 

 

त्यानंतर लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यावर बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली आणि कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. बिर्ला यांच्या आवाहनानंतरही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे सभापतींनी दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक, आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५ सादर सभागृहात सादर केली. त्यानंतर विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

 

राज्यसभेत आज ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आणि सज्जाद अहमद किचलू यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणारे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले.

 

त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

 

या अधिवेशनादरम्यान सूचिबद्ध असलेली एकूण १३ विधेयकं मंजूर होण्याची शक्यता आहे. या विधेयकांमध्ये राष्ट्रीय महामार्ग सुधारणा विधेयक, अणुउर्जा विधेयक, कॉर्पोरेट कायदे सुधारणा विधेयक, विमा कायदे सुधारणा विधेयक आणि भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक २०२५ यांचा समावेश आहे. 

 

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी नवी दिल्ली इथे काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ३६ राजकीय पक्षांचे ५० नेते उपस्थित होते.