पाकिस्तानने दहशतवादी गटांशी थेट संबंध ठेवून त्यांना आर्थिक सहकार्य केल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबूल केलं आहे. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कबुली देण्यात आल्यामुळे प्रादेशिक अस्थिरतेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी गटांशी पाकिस्तानच्या संबंधांची तपासणी केली आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं धोरण उघडकीस आणण्यासाठी भारतानं सतत प्रयत्न केले आहेत. हाफिज सईद आणि झाकी-उर रहमान लखवीसह अनेक दहशतवादी पाकिस्तानात आश्रयास असून या व्यक्ती तसंच लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावासारख्या संघटना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध यादीत समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं या मुद्द्याला मान्यता दिली आहे, हे अधोरेखित झालं आहे.