राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे. अवयवदान व्यापक समाज चळवळीचे पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे.
अवयवदान दिनानिमित्त आजपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यभरात अवयवदान पंधरवडा पाळला जात आहे. यानिमित्त जनजागृतीपर रॅली, सायकल रॅली, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकरता अवयवदान विषयावर कार्यशाळा, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आशा सेविका यांच्यासाठीही कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबाचा सत्कार होणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज अवयवदानाचा अर्ज केला आणि सर्वांना अवयवदान करण्याचं आवाहन केलं.
ठाणे शासकीय रुग्णालयात आज अवयवदान दिनानिमित्त कार्यक्रम झाला. अवयवदान ही सर्वात मोठी मानवसेवा असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास पवार यावेळी म्हणाले. यावेळी, डॉक्टर, परिचारक, विद्यार्थी उपस्थित होते.