पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच होईल, पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल आणि हेच आमचं स्पष्ट धोरण आहे, असा परखड इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दिला. ‘पाकिस्तानला टिकून राहायचं असेल तर त्यांना दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करावीच लागतील; दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही, दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहणार नाही. पाणी आणि रक्त देखील एकत्र वाहू शकत नाही’, असा सज्जड इशारा प्रधानमंत्री मोदी यांनी दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं; त्यानंतर प्रथमच प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राला संबोधित केलं. एकीकडे प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षिततेबाबत आश्वस्त करतानाच त्यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आणि संपूर्ण जगाला भारताची ठाम भूमिका ठणकावून सांगितली.
‘दहशतवादाच्या विरोधात भारताची कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील; अण्वस्त्र धमकीला भारत अजिबात भीक घालणार नाही’; असा परखड इशाराही प्रधानमंत्र्यांनी दिला. भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केलं आहे; ते थांबवलेलं नाही, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताची नजर आहे; दहशतवादाला खतपाणी घालणारं सरकार आणि दहशतवादी संघटना आम्ही वेगवेगळ्या मानत नाही, असं ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यानं शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं; पाकिस्तानला भारताच्या सीमांवर हल्ले करायचे होते, पण भारतानं पाकिस्तानच्या वायूसेनेच्या तळांवर नेमके आणि अचूक हल्ले करत ते नेस्तनाबूत केल्याचं, प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ नाव नाही; तर न्यायाची अढळ प्रतिज्ञा आहे; कोटी कोटी भारतीयांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे; असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी केलं. आमच्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा काय परिणाम होतो, हे आता प्रत्येक दहशतवाद्याला आणि दहशतवादी संघटनेला कळून चुकलं असेल, असं प्रधानमंत्री म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, सर्व राजकीय पक्ष दहशतवादविरोधी कारवाईसाठी एकत्र उभे ठाकले; आणि जेव्हा ‘राष्ट्र प्रथम’, या भावनेनं देश एकजूट होतो, तेव्हा कठोर निर्णयही घेतले जातात आणि त्यांचे परिणामही दिसतात, असं त्यांनी सांगितलं. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला पंतप्रधानांनी वंदन केलं; आपल्या शूर सैनिकांचं हे शौर्य त्यांनी देशातील माता भगिनींना समर्पित केलं.
भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे; मात्र शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत शक्तिशाली असणं देखील आवश्यक आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा या शक्तीचा वापर करणंही आवश्यक आहे, असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं.