दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत.
भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असताना रशियाशी संपर्क राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रशिया आणि भारत हे परस्परांचे धोरणात्मक भागीदार देश असून राजनैतिक मुद्दे आणि व्यापाराबाबत कायम एकत्रितपणे काम करतात ,असं प्रतिपादन द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी रशियाची राजधानी मॉस्को इथं आज माध्यमांशी बोलताना केलं. कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज मॉस्को इथं पोहोचलं. हे शिष्टमंडळ यानंतर स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटवियाला भेट देईल.
जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं बहुपक्षीय शिष्टमंडळ काल जपानला पोहोचलं. जपानची राजधानी टोकियो इथं ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, ग्रीस आणि दक्षिण कोरियाच्या राजदूतांशी त्यांनी संवाद साधला. जगातल्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमध्ये पाकिस्तानचा काही ना काही संबंध असल्याचं दिसून येत आहे. भारतीय नागरिकांना लक्ष्य केलं गेलं तर भारत प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असं संजय झा यांनी सांगितलं. संजय झा यांनी जपानच्या माजी प्रधानमंत्र्यांशी, परराष्ट्रमंत्र्यांशी तसंच इतर उच्च पदस्थांशी चर्चा करून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असा दृढ विश्वास व्यक्त केला.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं आणखी एक बहुपक्षीय शिष्टमंडळ काल अबू धाबीला पोहोचलं. या बहुपक्षीय शिष्टमंडळानं दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य-सहिष्णुतेच्या भूमिकेवर भर देण्यासाठी संयुक्त अरब अमिरात मधल्या उच्चाधिकाऱ्यांसोबत आणि माध्यम अधिकाऱ्यांसोबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. याचबरोबर खासदार बैजयंत पांडा, खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालची इतर तीन शिष्टमंडळं उद्या, तर खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ परवा विविध देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आज संध्याकाळी बहुपक्षीय खासदार शिष्टमंडळांना त्यांच्या परदेश दौऱ्यांपूर्वी माहिती देणार आहेत.