प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक काल घेतली. नेपाळ मधील हिंसा ही हृदय द्रावक आहे. नेपाळमधील तरुणांच्या जिवीतहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता,शांती आणि समृद्धीच महत्व आपल्या समाज मध्यमांवरील संदेशामधून अधोरेखित केलं.
दरम्यान नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. स्थानिक प्रशासनाच्या तसेच दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या मदत क्रमांकांवर संपर्क साधावा, अधिकृत माध्यमांद्वारेच दिलेली माहिती ग्राह्य धरावी आणि अफवांपासून दूर राहावं, असे आवाहन या केंद्रामार्फत करण्यात आलं आहे. दरम्यान, एअर इंडिया आणि इंडिगोसहित इतर अनेक विमानकंपन्यांनी नेपाळसाठीची प्रवासी उड्डाने रद्द केली आहेत.
आज काठमांडू, पोखरा, इटहरी यासह अनेक शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी संचारबंदी झुगारत नेपाळमधल्या अनेक शहरांमधे निदर्शनं आणि आंदोलनं केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत, मात्र अजूनही देशभरात तणावाचं वातावरण आहे.
नेपाळमधे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आणि नेपाळी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. नेपाळमधला तणाव शांत होईपर्यंत भारतीय नागरिकांनी तिथे प्रवास करण्याचं टाळावं असं आवाहन सरकारने केलं आहे. तसंच आवश्यकता असेल तर भारतीय दूतावासाच्या ९७७ ९८० ८६० २८८१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी दिल्ली ते काठमांडू दरम्यानची विमान उड्डाणं आज रद्द केली आहेत.