नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत. पूल वाहून गेले असून शुक्रवारपासून आतापर्यंत किमान ४७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, नेपाळ मधल्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इलम या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून किमान ३७ लोक दगावले आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
नेपाळमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्ता हानी बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या कठीण काळात भारत नेपाळच्या जनतेसोबत आणि सरकारसोबत उभा असल्याचं, त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.