रालोआ म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह रालोआचे इतर खासदार यावेळी उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचं या बैठकीत अभिनंदन केलं. ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यात सशस्त्र दलांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या वचनबद्धतेचं कौतुक करणारा ठराव सर्व खासदारांनी मंजूर केला. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चय आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे देशवासियांच्या मनात एकता आणि अभिमानाची भावना जागृत झाल्याचं सर्व खासदारांनी एकमुखानं म्हटलं.