आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे. १९९८ मध्ये आजच्याच दिवशी भारतानं राजस्थानात पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी केली. या दिवशी देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जातं. पहिलं स्वदेशी विमान हंस-३ च्या प्रक्षेपणात आणि सहाव्या जागतिक अणुचाचणीत शास्त्रज्ञ, अभियंते आणि नवोन्मेषकांच्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशातल्या शास्त्रज्ञांविषयी अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि १९९८ च्या पोखरण अणुचाचणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर, देशवासीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांना भारत सलाम करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.