प्रलंबित खटल्यांच्या जलद निवारणासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमात ठाणे जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षी दुसऱ्यांदा आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ठाणे जिल्हा न्यायालयात एकूण ९८ हजार ८९९ प्रकरणं मार्गी लागली तर एक अब्ज १२ कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकरणांमध्ये यशस्वी तोडगा निघाला. यामध्ये सुमारे ३० वर्ष प्रलंबित खटल्यांचा निवडा करण्यात आला.
राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाला मुंबईतल्या लघुवाद न्यायालयातही उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी १४८ पैकी ५८ प्रकरणं निकालात निघाली. सोलापुरातही २७ हजार ३२० प्रकरणं सामंजस्यानं मार्गी लागली तर ३१ जोडप्यांमधले विवाह विषयक वाद मिटवण्यातही यश आलं.