आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. आकाशवाणीचा वर्धापन दिन.
२३ जुलै १९२७ या दिवशी, देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत सुरू झालं. ८ जून १९३६ रोजी, भारतीय सार्वजनिक प्रसारण सेवा ऑल इंडिया रेडिओ मध्ये रुपांतरित झाली. ऑगस्ट १९३७ मध्ये केंद्रीय वृत्तसंस्था अस्तित्वात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५६ मध्ये आकाशवाणी हे नाव ऑल इंडिया रेडियोसाठी स्वीकारण्यात आलं. १९५७ मध्ये विविध भारती ही जाहिरात प्रसारण सेवा सुरू झाली.
१५ एप्रिल १९५४ पासून आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग श्रोत्यांच्या सेवेत आहे. विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या हे आकाशवाणीच्या बातमीपत्रांचं वैशिष्ट्य आहे. रेडिओ हा देशवासियांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची भूक भागवण्याचं करण्याचं कार्य करत आहे. देशवासियांसाठी महत्त्वाच्या घोषणा, तसंच उच्चपदस्थांचे संदेश आकाशवाणीवरुन प्रसारित केले जातात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पदावर आल्यापासून मन की बात या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरुन देशवासियांशी संवाद साधतात.