उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. या अंतर्गत, ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात, संशोधन, नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून अशा प्रकारची केंद्र सुरु करण्याविषयी सुचवलं होतं, त्याला कंपनीनं मान्यता दिली आहे. या केंद्रांमुळे युवकांना ‘एआय’, अर्थात, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच ‘रोबोटिक्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’, ‘डेटा अनालिटिक्स, ‘इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान’, ‘ऑटोमेशन’ या क्षेत्रांमधल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार असून युवकांकरता स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.