January 17, 2026 1:30 PM

printer

२९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमधे भाजपा सर्वात मोठा पक्ष

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काल मतमोजणी झाल्यावर रात्री उशिरा अंतिम निकाल आले. या निकालांनुसार भारतीय जनता पक्षानं १ हजार ४२५ जागा जिंकून राज्यभरात वर्चस्व गाजवलं आहे. शिवसेनेनं ३९९, काँग्रेसनं ३२४, राष्ट्रवादी काँग्रेसनं १६७, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं १५५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ३६, मनसेनं १३ आणि बसपानं ६ जागा जिंकल्या आहेत.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीनं बहुमताचा आकडा गाठत निर्णायक विजय मिळवला. भाजपानं ८९ जागांवर तर शिवसेना २९ जागांवर विजयी झाली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६५ जागांवर तर मनसेला ६ जागांवर यश मिळालं. काँग्रेसनं २४ जागा जिंकल्या, तर एमआयएमनं ८, राष्ट्रवादी काँग्रेसनं ३, समाजवादी पक्षानं २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं.

 

पुण्यात भाजपनं ११९ जागा जिंकून सत्ता काबीज केली. अजित पवार यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस २७ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ३ आणि काँग्रेसनं १५ जागा मिळवल्या आहेत.

 

नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांपैकी भाजपनं १०२ तर काँग्रेसनं ३४ जागा जिंकल्या.

 

नाशिकमध्ये भाजपानं ७२, शिवसेनेनं २६, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं १५, काँग्रेसनं ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ४ जागांवर विजय मिळवला.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं ५७, शिवसेनेनं १३ आणि काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला.

 

ठाण्यात १३१ जागांपैकी शिवसेनेनं ७५, भाजपनं २८, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ९ जागा जिंकल्या आहेत.

 

मालेगावमध्ये ८४ जागांपैकी एमआयएम पक्षानं २६, शिवसेनेनं १८ आणि काँग्रेसनं ३ जागा जिंकल्या.

 

सोलापूरमध्ये १०२ जागांपैकी भाजपनं ८७ आणि एमआयएम पक्षानं ८ जागांसह यश मिळवलं आहे.

 

कोल्हापूरमध्ये ८१ जागांपैकी काँग्रेस ३४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपनं २६ आणि शिवसेनेनं १५ जागांवर विजय मिळवला.

 

सांगली-मिरज-कुपवाडमध्ये ७८ जागांपैकी भाजपनं ३९, काँग्रेसनं १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं १६ जागा जिंकल्या आहेत.

 

लातूरमध्ये ७० जागांपैकी ४३ जागा जिंकून काँग्रेसनं पालिका आपल्या ताब्यात घेतली; इथं भाजपनं २२ आणि वंचित बहुजन आघाडीनं ४ जागांवर विजय मिळवला.

 

नांदेड-वाघळामध्ये ८१ जागांपैकी भाजपनं ४५, एमआयएम पक्षानं १४ आणि काँग्रेसनं १० जागा जिंकल्या आहेत.

 

अमरावतीत ८७ जागांपैकी भाजपनं २५, युवा स्वाभिमान पक्षानं १६ आणि काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला.

 

अकोल्यात ८० जागांपैकी भाजपनं ३८, काँग्रेसनं २१ आणि वंचित बहुजन आघाडीनं ९ जागा जिंकल्या आहेत.

 

चंद्रपूरमध्ये ६६ जागांपैकी काँग्रेसनं २७ आणि भाजपनं २३ जागांवर विजय मिळवला.

 

परभणीत ६५ जागांपैकी २५ जागा जिंकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला; इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं ११, भाजपनं १२ आणि काँग्रेसनं १२ जागा जिंकल्या आहेत.

 

जालन्यात ६५ जागांपैकी भाजपनं ४१ आणि शिवसेनेनं १२ जागांवर विजय मिळवला.

 

इचलकरंजीमध्ये ६५ जागांपैकी भाजपनं ४३ आणि राजर्षी शाहू विकास आघाडीनं १७ जागा जिंकल्या आहेत.