मुंबई विद्यापीठात १७ व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधले ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेदरम्यान संसदेच्या अधिवेशन काळात होणाऱ्या दैनंदिन कामकाजामध्ये समाविष्ट असणारा प्रश्नोत्तराचा तास, ध्यानाकर्षण प्रस्ताव, विशेषाधिकार भंगाची सूचना, अल्पकालीन चर्चा तसंच विधेयकाला मान्यता देण्याबाबतच्या कामकाजाचं अभिरूप सादरीकरण करण्यात आलं. ५५ मिनिटांच्या या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला. विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं.
नवी दिल्लीतल्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीनं या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख व्हावी, त्यांच्यातल्या वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांना वाव मिळावा हा या स्पर्धेमागचा उद्देश असतो.