पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात 100पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी काल दिली. लष्करी कार्यवाही महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कार्यवाही महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदल कार्यवाही महासंचालक व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी युसुफ अजहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सिर अहमद यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हाच होता, ही बाब भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी अधोरेखित केली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ वारंवार झालेला गोळीबार, भारताच्या हद्दीत आलेले असंख्य ड्रोन्स, इतर तत्सम यंत्रं यामुळे भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या तळांना लक्ष्य केलं; या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 जवान मृत्युमुखी पडल्याचंही त्यांनी सांगितलं.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर काही तासांतच पाकिस्ताननं पुन्हा सीमेपलीकडून गोळीबार केला; या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर द्यायचं पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला दिलं असल्याचंही लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं. भारतानं आत्तापर्यंत केलेल्या कोणत्याही कारवाईचा उद्देश पाकिस्तानी सशस्त्र दलांना किंवा नागरिकांना लक्ष्य करणं हा नव्हता, तर तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हेच भारताचं लक्ष्य होतं, असं या तिन्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, भारताच्या लष्करी कार्यवाहीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि पाकचे समपदस्थ आज दुपारी 12 वाजता दीर्घकालीन सामंजस्य कराराच्या दृष्टीने चर्चा करणार आहेत. तत्पुर्वी शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर केवळ दोन तासांतच पाकिस्ताननं नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार आणि ड्रोन घुसखोरी करुन उल्लंघन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.