शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा तिचा आत्मा आहे. त्यामुळेच विकसित भारत घडवायचा असेल तर विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. नागपूर इथे विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीवेळी ते बोलत होते.
विकसित, गरिबीमुक्त गाव हे आपल्या सरकारचं लक्ष्य असून त्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत. कृषि क्षेत्रातल्या विविध संस्था स्वतंत्रपणे कार्य करत असून जर या संस्थांचा आपापसात समन्वय साधला आणि त्यांना योग्य दिशा दिली तर कृषिक्षेत्रात चमत्कार होऊ शकतो. त्यामुळे आता एक देश, एक राज्य, एक कृषी आणि एक पथक अशा योजनेची आपण घोषणा करत असल्याचंही चौहान यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच त्यांनी ‘नॅशनल सॉईल स्पेक्ट्रल लायब्ररीचं’ उद्घाटन केलं.