पाकिस्तानशी काश्मीरबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा करायची असेल तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरबाबतच होईल, असं भारतानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्ली इथं आज वार्ताहरांशी संवाद साधला. भारताने पाकिस्तानमधे असलेल्या दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली होती, त्यावर पाकिस्तान चर्चा करणार असेल तर भारत कधीही चर्चेला तयार आहे, असं जयस्वाल म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाला मदत करणं थांबवणार नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगित राहील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्यात १० मे रोजी चर्चा झाली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारताचा प्रखर विरोध आहे, असं डोवाल यांनी वांग यी यांना सांगितलं असं जयस्वाल यांनी वार्ताहरांना सांगितलं.