ख्यातनाम वन्य जीव अभ्यासक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चितमपल्ली यांचं काल संध्याकाळी वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. जंगल आणि वन्य प्राण्यांवर प्रेम करणारे चितमपल्ली यांना ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखलं जातं.
चितमपल्ली यांनी महाराष्ट्र सरकारच्या वन विभागात ३६ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये त्यांनी काम केलं. वन्यजीव संरक्षणात त्यांनी मोठं योगदान दिलं. नागझिरा आणि मेळघाट इथल्या विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारायला त्यांनी मदत केली.
मारुती चित्तमपल्ली यांचं साहित्य मुख्यतः मराठी भाषेत असून ते वन्यजीव, निसर्ग आणि आदिवासी जीवनावर केंद्रित आहे. पक्षीविज्ञान आणि वन्यजीवनाशी संबंधित अनेक नवीन शब्द आणि संज्ञा त्यांनी मराठी भाषेत आणल्या. अनेक पक्षी-शास्त्रीय संकल्पनांना त्यांनी मराठी नावं दिली. “चकवा चांदणं” ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. त्याशिवाय, निलवंती, जंगलाचं देणं, रातवा, रानवाटा, केशराचा पाऊस, सुवर्ण गरुड या काही त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृती आहेत.
२००६ साली सोलापूर इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. चितमपल्ली यांना २०१७ मध्ये, महाराष्ट्र सरकारने विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. जानेवारी २०२५ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.