मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. आता आपल्याला रणभूमीत उतरून मैदान गाजवायचं असून, विजय खेचून आणायचा आहे. आता ही आरपारची लढाई असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरायचे नाही, असं ते म्हणाले. येत्या २७ ऑगस्टला आंतरवली सराटीतून निघून दोन दिवसांत मुंबईत पोहोचण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नियोजित मोर्चाचा मार्ग आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली. या राज्यव्यापी बैठकीला राज्यभरातून मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते.