डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘ऑपरेशन सिंदूर’ हे निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहिम नाही, तर ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  या कारवाईने जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं  मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं. आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्यानं केलेल्या पराक्रमानं प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं ताठ झाली. या कारवाईतली अचूकता अद्भुत असल्याचं ते म्हणाले. त्याचं दर्शन देशभरात तिरंगा यात्रांच्या रुपाने  झाल्याचं ते म्हणाले. या मोहिमेत स्वदेशी शस्त्र, उपकरण आणि तंत्रज्ञानाची ताकदही दिसली. 

 

या मोहिमेनंतर संपूर्ण देशात वोकल फॉर लोकल या संकल्पनेलाही नवी ऊर्जा मिळाली आहे. हीच तर भारताची खरी ताकद आहे, या टप्प्यावर प्रत्येक भारतीयानं जिथे शक्य असेल तिथे स्वदेश निर्मित वस्तूंना प्राधान्य देण्याचा निर्धार केला पाहीजे असं आवाहन त्यांनी केलं. ही केवळ आर्थिक आत्मनिर्भरतेची गोष्ट नाही, तर राष्ट्रनिर्मितीतले भागीदार बनण्याची भावना आहे, असं ते म्हणाले.

 

देशाच्या नक्षलग्रस्त भागात मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्याचं सांगून गडचिरोली जिल्ह्यातल्या काटेझरी गावात पहिल्यांदाच बस सेवा पोहचल्याचं उदाहरण  त्यांनी दिलं. माओवाद्यांच्या प्रभावाखालच्या दंतेवाडामधल्या विद्यार्थ्यांनी दहावीत मिळवलेल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला. या बदलांमुळे आपल्याला अभिमान वाटत असल्याचं ते म्हणाले.

 

आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता एका महिन्यापेक्षाही कमी काळ उरला असून, प्रत्येकाने आता योगाभ्यासाशी जोडून घ्यावं असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं. यंदाच्या योगदिनासाठी आपण विशाखापट्टणममधल्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  

 

आयुर्वेदाच्या क्षेत्रातही प्रगती होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या अनुषंगानंच जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांसोबत एक सामंजस्य करार झाला असून, त्यामुळे आयुष उपचार पद्धतीला  जगभरात वैज्ञानिक पद्धतीनं पोहोचवता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

लहान मुलांना लहानपणापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी लावण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. याअनुषंगानं सीबीएसईच्या शाळांमध्ये मुलांना किती प्रमाणात साखर खावी याबद्दल जागरूक करण्यासाठी शुगर बोर्ड हा उपक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अशाच प्रकारच्या उपाययोजना सर्व कार्यालयं, उपहारगृह आणि संस्थांमध्येही राबवला गेला पाहीजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

स्वच्छ भारत तसंच कचऱ्यापासून विशेषतः टाकाऊ कागदापासून पुनर्निमीतीबाबत देशभर होत असलेल्या प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. महाराष्ट्रात जालन्यामध्ये १०० टक्के पुनर्प्रक्रिया केलेल्या कच्च्या मालापासून पॅकेजिंग रोल आणि पेपर कोर बनवले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. एक टन कागदाच्या पुनर्प्रक्रियेमुळे १७ झाडं तुटण्यापासून वाचतात आणि हजारो लिटर पाण्याची बचत होते, अशी माहिती त्यांनी दिली. भारत तिबेट सीमा पोलीसांच्या सदस्यांनी माउंट मकालू सारख्या उंच ठिकाणी गिर्यारोहणासोबतच स्वच्छता केल्याचं उदाहरण मांडत, आपणही कागदी कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेत योगदान देण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं. जेव्हा प्रत्येक नागरिक देशासाठी आपण आणखी काय चांगलं करू शकू असा विचार करेल, तेव्हा आपण सगळे मिळून मोठं परिवर्तन घडवून आणू शकू, असं ते म्हणाले.

 

नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची अस्मिता, साईराज परदेशी यांच्यासह इतर खेळाडूंनी रचलेल्या विक्रमांची माहिती मोदी यांनी दिली. क्रीडा क्षेत्रातल्या युवा प्रतिभेसाठी स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात. अशा स्पर्धांमुळे क्रीडा क्षेत्रातलं भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक मधमाशी दिनाचा उल्लेखही त्यांनी केला.  गोडव्यासोबतच आरोग्य, स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेतही मधाचं योगदान मिळू शकत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. गेल्या अकरा वर्षात भारतात मधमाशी पालन क्षेत्रात मधूर क्रांती घडून आली आहे असं ते म्हणाले. दहा अकरा वर्षांपूर्वी भारतातलं मध उत्पादनाचं प्रमाण वर्षाला ७० ते ७५ मेट्रिक टन इतकं होतं आता त्यात वाढ होऊन ते जवळपास सव्वा लाख मॅट्रिक टनांपर्यंत पोहोचलं असल्याची माहिती त्यांनी दिली. मधाचं उत्पादन आणि निर्यातीत आता भारत जगातल्या आघाडीच्या देशांमध्ये पोहचला असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाची या यशात महत्वाची भूमिका असल्याचं ते म्हणाले.  याअंतर्गतची यशस्वी व्यावसायिक उदाहरणं त्यांनी मांडली.  मधाचा गोडवा म्हणजे आत्मनिर्भर भारताचा स्वाद आहे असं म्हणत श्रोत्यांनी स्थानिकांकडूनच मध खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मधमाशांच्या संरक्षण संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगतांना त्यांनी पुणे इथल्या अमित याच्या प्रयत्नांचा उल्लेखही केला.

 

गेल्या केवळ पाच वर्षांच्या काळातच गुजरातच्या गिर जंगलातली सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला कायमच जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशभरातल्या ड्रोन दीदींची यशस्वी कामगिरीही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा