महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात बदल

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात  बदल झाल्याचं दिसून येत असल्याचं युनिसेफ इंडियाचे हवामान तज्ज्ञ युसूफ कबीर यांनी आज सांगितलं. पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि युनिसेफ, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वता या विषयावर मुंबईत आयोजित परिसंवादात ते बोलत होते. 

 

सातारा जिल्ह्याच्या काही भागात कमी पाऊस पडायचा, आता तिथं  मुसळधार पाऊस होत असल्याकडे, कबीर यांनी लक्ष वेधलं. हवामानातल्या या बदलांचा अभ्यास केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याची गरज असून त्यादृष्टीनं एकत्रितपणं पावले उचलावीत असं त्यांनी सांगितलं.

 

एकल प्लॅस्टिकचा वापर टाळणं, अतिरीक्त विजेचा वापर टाळणं, पाण्याचा जपून वापर करणं अशा लहान लहान कृतींमधून पर्यावरणाची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, असं आवाहन पीआयबीच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी यावेळी केलं.