धुळे शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळाने धुळ्यात काही ठिकाणी झाडे पडली आहे. तर लोकांची तारांबळ उडाली.
भारतीय हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार डहाणू, वाढवण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे डहाणू मधल्या अनेक मच्छीमार बोटींचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर जवळपास सर्वच भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी कांदा चाळींवरील पत्रे उडाले, तर काढून ठेवलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. या पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या कांद्याच्या पातीत पाणी शिरल्यानं कांदा सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रत्नागिरीत पहाटे तीननंतर जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
मुंबई आणि ठाणे परिसराला काल पावसाबरोबरच धुळीच्या वादळाचा तडाखा बसला.
गेल्या २४ तासात धुळे जिल्ह्यात वादळी पावसानं थैमान घातलं. धुळे शहरातही अनेक झाडं उन्मळून पडली. यामुळे वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर परिसरात वादळी वार्यासह गारांचा जोरदार पाऊस झाल्याने पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.