राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार होत असून कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला पूर आला आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून विविध प्रकल्पांमधून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहराच्या जवळून वाहणाऱ्या सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट शहरात घुसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आपत्ती निवारण कक्षाच्या सहाय्यानं बचावकार्य सुरू असून होड्यांधून नागरिकांची सुटका करण्यात आली. शेवगाव तालुक्यात देवटाकळी इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं.
बीड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळं काही भागात घरांमध्ये पाणी शिरलं. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात बेळसांगवी गावातल्या अनेक नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं. नांदेडमधे विष्णुपुरी प्रकल्पात अद्याप पाण्याची आवक सुरु असून गोदावरी नदीप्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे एक बळी गेला आहे. नांदेड शहराच्या अनेक भागात पुराचं पाणी शिरल्यानं ९७० नागरिकांना निवारा केंद्रात हलवलं आहे. ग्रामीण भागातही एक हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरित केलं आहे.
परभणी जिल्हा आणि शहरात अतिवृष्टीची नोंद झाली असून पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं घरांची पडझड झाली. बुलढाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा आणि येलदरी धरणातून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाल्यानं नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला महापूर आला आहे. येलदरी आणि इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या कोंढुर गावामध्ये पाणी शिरल्यानं जन जीवन विस्कळीत झालं आहे. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ७८ शाळांमधल्या १२५ वर्गखोल्यांची पडझड झाली.
नाशिकमधे गंगापूरसह अनेक धरणातून विसर्ग वाढवला आहे. धुळे जिल्ह्यात धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर या तालुक्यांमधे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे पांझरा, बोरी, अरुणावती नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. अक्कलपाडा धरणातून तसंच अनेर, मालनगाव आणि बुराई या मध्यम प्रकल्पातुन सुद्धा पांझरा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अकोला जिल्ह्यासह अकोला शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं.
जालना जिल्ह्यात काल मध्यरात्री आणि आज झालेल्या मुसळधार पावसानं भोकरदन, जाफराबाद, घनसावंगी तालुक्यात पुराचं पाणी शेतशिवारात शिरून पिकं पाण्याखाली गेली. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज भोकरदन तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
मुंबई शहरासह उपनगरात काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्यानं अशा ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागानं उपसा पंप २४ तास कार्यान्वित ठेवले आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह, ढगांचा गडगडाट आणि विजांसह पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता उद्या पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उल्हास नदीनं पूररेषा ओलांडल्यानं ठाणे-कल्याण महामार्गावरची वाहतूक तात्पुरती वळवावी लागली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सकाळी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांशी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं….
– होल्ड बाईट मुख्यमंत्री – –
पावसामुळे धरणांमधून विसर्ग वाढवण्याआधीच नदीकाठच्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याकडे लक्ष द्यावं, आणि सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Site Admin | September 28, 2025 7:00 PM | Maharashtra Rain
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम