राज्यातल्या महत्वाच्या सर्व प्रकल्पांचं भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी घेतला. त्यात शक्तीपीठ महामार्ग, पुणे रिंग रोड यासह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या..
प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचं तंतोतंत पालन करावं, सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावं. सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.