राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानुसार येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार असून १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. १८ नोव्हेंबरला उमेदवार अर्जांची छाननी केली जाईल, २१ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेता येईल तसंच २६ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल असं वाघमारे यांनी सांगितलं. या निवडणुकीत एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड करतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं.
ही निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार आहे, असं दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं. मतदार याद्यांमधल्या दुबार नावाबाबत निवडणूक आयोगाने दक्षता घेतली आहे, यासाठी एक टूल विकसित केल्याचं वाघमारे यांनी सांगितलं.
दुबार नाव असलेल्या मतदाराने संपर्क केल्यानंतर प्रतिसाद दिला नाही तर त्याच्या नावापुढे सर्व मतदान केंद्रावर डबल स्टार म्हणून नोंद होईल. अशा मतदाराकडून आपण दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असं हमीपत्र लिहून घेतलं जाईल, असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं.