गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार 356 कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्हांमधल्या २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१ हेक्टरहून अधिक बाधित पिकांसाठी ही मदत मिळेल. यासाठीचा शासन निर्णय झाल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.
या आपत्तीत मृत्यूमूखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना, ज्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना जिल्हास्तरावरुन मदत दिली जाणार आहे. यामुळे त्या प्रकारातल्या मदतीचं वितरण ताबडतोब होईन असंही मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.