राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते.
केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण ३ हजार १३२ कोटी रुपयांच्या मदतीसाठी मान्यता दिली असून त्यापैकी १ हजार ६३१ कोटी रुपयांच्या मदतीचं वितरण एप्रिल महिन्यात झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजचाही समावेश असल्याचं ते म्हणाले. कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती देणं, विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये दिलासा देणं यांसारखे अनेक निर्णयही घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप चालू नसताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अमित शहा यांनी केलं.
पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील तसंच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण त्यांनी केलं. तसंच प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित परिसराचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भाषणं यावेळी झाली.