महाॲग्री-एआय (MahaAgri-AI), अर्थात महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. यामुळे कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातले ॲग्रीस्टेक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढं न्यायला मदत होणार आहे.
आज झालेल्या बैठकीत इतरही महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळानं घेतले. त्यानुसार केंद्र सरकारच्या WINDS, म्हणजे Weather Information Network Data System प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रं उभारली जाणार आहेत. यासाठी महावेध प्रकल्पाला मुदतवाढ द्यायचा निर्णय यावेळी झाला.
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीनं वाढ, हयात जोडीदारालाही मानधन मिळणार, मुंबई मेट्रो मार्ग-२अ, २ ब आणि ७ या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाला मुदतवाढ, विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्त्वावर हाती घ्यायला मान्यता, इत्यादी निर्णयही या बैठकीत झाले.