राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. तसंच काही ठिकाणचे अर्ज बाद झाल्याने काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
नाशिकमधे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे हे अर्ज बाद झाले आहेत. मालेगाव महानगरपालिकेत प्रभाग ६ मधे प्रतिस्पर्धी पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनीरा शेख या बिनविरोध निवडून आल्या. मालेगाव महानगरपालिकेत दाखल अर्जापैकी १५ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे तीन आणि भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवरांची संख्या आता आठ झाली आहे.
जळगाव महानगरपालिकेतल्या दाखल अर्जांपैकी २१२ अर्ज बाद झाले. तसंच प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने प्रभाग क्रमांक १२ ब मधल्या भाजपा उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. धुळे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १७ ब मधे दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या उमेदवार सुरेखा उगले यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. याआधीच दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यामुळे धुळ्यातून भाजपाच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.