मुसळधार पावसामुळे नद्यांचे प्रवाह वाढले असून राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९८ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या ६६ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणातून १८ हजार ८६४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून अडीच लाख क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात केला जात आहे. नांदेड शहरातल्या अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. गोदावरी काठच्या शंभरहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात तेरणानदीचं पाणी काठच्या उजनी गावात शिरलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं करमाळा, माढा, मोहोळ, अपर तहसील मंद्रूप, उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं पाण्याच्या खाली शोध कार्य करण्याच्या क्षमतेच्या ५ यांत्रिक बोटी, सोबत १५ व्यक्तींचं पथक आणि ४५ लाईफ जॅकेट, ५ रिंग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात गोदावरी आणि दुधना नदीला पूर आला असून ३६ गावांचा संपर्क तुटला असून ५७८ नागरिकांना मदत पथकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं.जिल्ह्यात ५ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती ,त्यातल्या १लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरच्या सोयाबीन,कापूस,तूर, मूग,हळद यासह इतर पिकांचं नुकसान झालं. सप्टेंबर महिन्यात २८८ गावातल्या ६६ हजार ३४ हेक्टर वरच्या पिकांचे नुकसान झालं असून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.