स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. काही अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेतल्या जातात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्रं विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणुक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्यूशन कमिटी अभ्यास करत आहे, तिचा अहवाल अद्याप न आल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नाही असं आयोगानं म्हटलं आहे.
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेण्याचे, तसंच दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगानं आज दिले.
 
									 
		 
									 
									 
									 
									