पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वार्षिक १२ टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रिय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी दिली आहे. शाश्वत पशुधन परिवर्तन याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते काल इटलीमध्ये बोलत होते. यामुळे कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत ३१ टक्के वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.
भारत दुग्धोत्पादनात जगात आघाडीवर आहे. पशुधनाच्या लसीकरणाचं राष्ट्रीय गोकुळ अभियान, भारत पशुधन डिजिटल ओळख आणि महिलांच्या नेतृत्वातील सहकारी पशुपालन व्यवसाय यासारखे बदल घडवून आणणारे आणि सर्वसमावेशक उपक्रम भारतात सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि गरीबी निर्मूलनासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत आहे. शेतकरी केंद्रित धोरणं राबवून पशुधन आणि दुग्धोत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचं राजीव रंजन म्हणाले. कोरोना काळानंतर २६९ दशलक्ष लोकांना गरीबीरेषेच्या वर काढण्यात यश आल्याचंही त्यांनी सांगितलं.