मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आत्तापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या १२ ते १४ हजार महिलांच्या नावावर पुरुषांची बँक खाती जोडलेली असल्याचं पडताळणीत आढळलं असून अशा प्रकरणांचा सखोल तपास करून कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री केल्याचं तटकरे म्हणाल्या. तसंच ८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही घेतलेल्या रकमेची वसुली गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सुरू असून पुढच्या दोन महिन्यांत ती पूर्ण होईल, असंही त्या म्हणाल्या.
वाढती वाहनसंख्या तसंच ई – चलानच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. ई चलानची वसुली करण्यासाठी लोक अदालत सारखा उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.