गुंतागुंतीच्या जागतिक वातावरणात भारताचं खरं सामर्थ्य ‘अंतर्गत क्षमता-बांधणी’ मध्ये आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ करणं, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा सुधारणं यावर भारताचा सर्वाधिक भर असेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या ‘कौटिल्य परिषदेत’ जागतिक धोरणांवर त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं. भारत कोणत्याही एका गटात सामील न होता, जास्तीत जास्त भागीदारांशी संबंध ठेवून आपली ‘धोरणात्मक स्वायत्तता’ कायम जपेल, असं ते म्हणाले.
प्रगत शस्त्रास्त्रांमुळे युद्धाच्या स्वरूपात मूलभूत बदल झाले असून युक्रेन-रशिया, इस्रायल-इराण, अझरबैजान-आर्मेनिया या सारख्या संघर्षांमध्ये, ‘संपर्करहित युद्ध’, निर्णायक परिणाम साधत असल्याचं त्यांनी नमूद केलं.