जागतिक स्थैर्य आणि शांततेला सर्वात जास्त धोका दहशतवादापासून आहे, त्यामुळे जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. मलेशियातील क्वालालंपूर इथं २० व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला ते आज संबोधित करत होते. दहशतवादाशी अजिबात तडजोड केली जाणार नाही असं सांगत जयशंकर यांनी जगातल्या सर्व देशांना दहशतवादाविरोधात मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत भारत वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार जयशंकर यांनी केला. तसंच २०२६ हे वर्ष भारत आसियान सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असल्याचं सांगितलं.
गाझामधल्या संघर्षविरामाचं जयशंकर यांनी स्वागत केलं, तसंच युक्रेन-रशिया संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं. प्रादेशिक सहकार्याबाबत भारताच्या तत्परतेचा उल्लेख त्यांनी केला.
शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूझिलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांची भेट घेतली. भारत आणि न्यूझिलंड दरम्यानचं द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबतच्या लक्सन यांच्या वचनबद्धतेचं जयशंकर यांनी कौतुक केलं तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने लक्सन यांना शुभेच्छा दिल्या.