आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज्स यांच्यात दुसरा पात्रता सामना होणार आहे. अहमदाबाद इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.
या क्वालिफायर टू अर्थात, दुसऱ्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबईनं गुजरातचा पराभव केला होता.
या सामन्याआधी साखळी फेरीत गुणतालिकेत सर्वोच्च दोन स्थानी असलेल्या पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामन्यात थेट प्रवेशासाठी पहिला पात्रता सामना झाला होता. त्यात पंजाबचा पराभव करून बंगळुरूनं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या पराभवानंतरही स्पर्धेच्या नियमानुसार पंजाबला अंतिम सामन्यात प्रवेशासाठीच्या दुसऱ्या पात्रता सामन्यात खेळण्याची संधी आहे.
आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आजच्या सामन्यातला विजेता संघ आणि बंगळुरू यांच्यात येत्या ३ जूनला अहमदाबाद इथं अंतिम लढत होईल.