आर्थिक आणि व्यापारी भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियात आज वर्ष २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर सहमती झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली.
(गेल्या ८ दशकांपासून भारत आणि रशियामध्ये संबंध असून ते अधिकाधिक बळकट होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. दोन्ही देशातल्या आर्थिक सहकार्य करारानं हे संबंध आणखी दृढ होतील असं ते म्हणाले
कृषी आणि खत निर्मिती क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत. संयुक्तरित्या युरिया उत्पादनासाठी दोन्ही देशात प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. युरेशियन आर्थिक महासंघासोबतचा मुक्त व्यापार पूर्ण करण्याची भारताची तयारी आहे. रशियाचा नागरिकांना लवकरच ३० दिवसाचा ई-पर्यटन विसा आणि ३० दिवसांचा समूह पर्यटन विसा दिला जाईल, अशी घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केलं.
दहशतवादाच्याविरोधात काम करण्यासाठी दोन्ही देश तयार आहेत. शिवाय युक्रेनचा मुद्दा शांततापूर्ण मार्गाने निकाली निघावा यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सहकार्य करण्याला प्राधान्य देण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. वार्षिक व्यापार १०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवण्यावरही सहमती झाल्याची माहिती पुतीन यांनी दिली. भारताला इंधनाचा अखंड पुरवठा करण्यासाठी तसंच ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची तयारीही रशियानं दाखवली.
यावेळी संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि प्रसारमाध्यम क्षेत्राशी निगडीत १६ करारांची दोन्ही देशांमध्ये देवाणघेवाण झाली.
त्यानंतर दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया बिझनेस फोरमला संबोधित केलं. २०३० पूर्वी द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भारतात उद्योग स्थापन करण्यासाठी रशियन व्यावसायिकांना आमंत्रण दिलं. भारतातून अनेक वस्तूंची खरेदी वाढवण्यासाठी रशियन कंपन्या उत्सुक असल्याचं पुतिन यावेळी म्हणाले.)