भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, वृत्तवाहिन्या, डिजिटल मंच आणि वार्ताहरांनी भारतीय सशस्त्र दलांच्या हालचाली आणि कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये, अशी सूचना संरक्षण मंत्रालयानं आज केली. अशी संवेदनशील आणि गोपनीय माहिती प्रसारित केल्यामुळे सशस्त्र दलांच्या कामात अडथळा येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, चंदीगढ, हिमाचल प्रदेशसह काही राज्यांमध्ये विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. देशभरातले विमानतळ बंद केल्याच्या वृत्ताचं मात्र नागरी उड्डयन मंत्रालयानं खंडन केलं आहे.
पाकिस्तानकडून आज पुन्हा ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन चंदीगढमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नागरीकांना घरातच राहण्याची सूचना हवाई दलानं केली आहे.