भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करण्याच्या निर्णयाचं जगभरातल्या देशांनी स्वागत केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धविरामाचं स्वागत केलं असून उभय देशांनी विकासावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे. हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक, दीर्घकालीन समस्यांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल अशी गुटेरस यांना आशा असल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टेफान डुजारिक यांनी सांगितलं.
युरोपीय संघाचे परराष्ट्रव्यवहार प्रमुख काजा कल्लास यांनी शस्त्रसंधीचं महत्त्व अधोरेखित करुन त्याच्या पालनाबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. शांततेसाठी उचलेल्या पावलांचं स्वागत करीत यूनायटेड किंगडमनं युद्धविरामाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.