भारत आणि पाकिस्तानदरम्यान इतर कोणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जय शंकर यांनी केलं आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या वेळी ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पाकिस्तानशी चर्चा द्विपक्षीयच होईल , ती देखील काश्मीरमधे पाकिस्तानने केलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरच असं त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात भारताच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही आणि या मुद्यावर कायम देशभरात सहमती आहे असं ते म्हणाले.
पाकिस्तानने दहशतवाद्यांचे आसरे उद्धवस्त करुन त्यांना भारताच्या हवाली केलं पाहिजे. उभय देशांदरम्यान गोळीबार आणि लष्करी कारवाई संदर्भात ते म्हणाले की ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर असून पाकिस्तानी लष्कराने त्यापासून दूर राहावं असा संदेश भारताने दिला होता. मात्र पाकिस्तानने तो मानला नाही. १० मे रोजी पाकिस्तानला जबर फटका बसल्यानंतर त्यांनी शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. पाकिस्तानने दहशतवादाची रसद कायमची तोडल्याचं स्पष्ट होईपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील असं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेबरोबरच्या व्यापाराविषयी वाटाघाटी सुरु असून उभयपक्षी हिताचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं