भारताला आर्थिक विकास साधण्यासाठी देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावं लागेल- मुख्य आर्थिक सल्लागार

डिजिटायजेशन याचा अर्थ नियंत्रण हटवणं असा घेऊन या दोन संकल्पनांमध्ये गल्लत होत असल्याचं निरीक्षण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी नोंदवलं आहे. ‘आयव्हीसीए’ या संस्थेच्या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन, दोन्ही ठिकाणी अनावश्यक नियमन दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारताला आर्थिक विकास साधण्यासाठी देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावं लागेल, असं नागेश्वरन यांनी नमूद केलं. जागतिकीकरणाचा फायदा जसा भूतकाळात झाला, तसा आता होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. जागतिक आर्थिक परिस्थितीचा विचार करा महागाई नियंत्रणात ठेवणं जास्त कठीण असेल, मात्र भारताने जर महागाई दर ३ ते ४ टक्क्यांवर आणला, तर रुपयाचं अवमूल्यन थांबवणं शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.