आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे.
पहलगाम इथला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरुद्ध खेळल्याने राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसेल, त्यामुळे हा सामना रद्द करावा अशी याचिका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यावर तातडीने सुनावणी घ्यायला आज न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठाने नकार दिला.