मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असून उद्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम राहिला. पावसामुळे अनेक ठिकाणी घर-गोठे यांची पडझड होऊन मोठं नुकसान झालं आहे. दोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. दरम्यान समुद्र खवळला असल्यान अनेक नौका सुरक्षेसाठी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. या पावसामुळे महावितरणचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तो सुरु करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
दरम्यान, आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे काल वाहतूक ठप्प झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून, संगमेश्वरजवळ काल संध्याकाळी वडाचं झाड कोसळल्यानं कसबा उच्चदाब वीजवाहिनीचे सहा खांब वाकले. त्यामुळे अनेक भागांचा विद्युतपुरवठा खंडित झाला.
लातूर जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.