उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योजकांना केलं. मुंबईत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयएमसी भारत कॉलिंग परिषदेचं उद्घाटन गोयल यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. अनुदान, उच्च आयात शुल्क अशा सरकारच्या मदतीवर कधीपर्यंत अवलंबून राहणार असा प्रश्न त्यांनी विचारला. एक देश म्हणून या सुरक्षित वातावरणातून आणि बचावात्मक पावित्र्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे, नवोन्मेष, उत्पादकता वाढवणं, कौशल्य आणि कार्यक्षमता सुधारणं यातून स्पर्धात्मकता वाढेल असं गोयल म्हणाले.
आपण जोपर्यंत स्पर्धात्मक होत नाही, जगासोबतचा व्यापार वाढता नाही तोपर्यंत देशाला विकसित करण्याचं १४० कोटी नागरिकांचं ध्येय साध्य होणार नाही, असं गोयल म्हणाले. उद्योगांनी आपली गुणवत्ता वाढवावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे देश जागतिक बाजारात मोठी भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे, असंही गोयल म्हणाले.
यावेळी आयएमसीचे अध्यक्ष संजय मरीवाला, आयएमसी इंटरनॅशनल बिजनेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश जोशी, सीआयआय आणि इआय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी उपस्थित होते.