कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्राध्यापक हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगरजवळ हा अपघात झाला. प्राध्यापक हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
संस्कृत भाषेसाठी निष्ठेनं झटणारा एक संशोधक, अभ्यासक आणि उत्तम प्रशासक गमावला आहे, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.