जीबीएस आजार संसर्गजन्य नाही; परिस्थिती नियंत्रणात असल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा निर्वाळा

महाराष्ट्रात गुईलेन बॅरी सिंड्रोम – जी बी एस या आजाराच्या प्रादुर्भावाविषयी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काल दूरस्थ माध्यमातून आढावा बैठक घेतली. संशयित रुग्णांची संख्या वाढत असली तरी हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं. या आजाराच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारशी समन्वय राखून काम करावं असं ते म्हणाले. केंद्रसरकार या संदर्भात हरप्रकारे मदत करील असं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे १६३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२७ रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं तपासातून निश्चित झालं आहे. काल अहिल्यानगर शहरात या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळून आला असून, त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.