ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीममध्ये रस्ते जलमय झाले आहेत तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याकडून सतत मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, सध्या राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला राज्याच्या कृषी विभागानं पुन्हा एकदा दिला आहे. तर, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ८ पूर्णांक ३ मिलिमीटर तर विभागात ८ पूर्णांक ९ मिलिमिटीर पावसाची नोंद झाली.